सोलापूर – विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज, ‘कोणतंही संकट आलं की सगळी जबाबदारी केंद्रावर ढकलायची आणि आपण नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण योग्य नाही.’ अशी टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांच्यावर निशाणा साधला होता. फडणवीस यांच्या या टीकेला आता ठाकरे यांनी, ‘केंद्रातलं सरकार हे देशाचं सरकार आहे, परदेशातील सरकार नाही.’ असं जोरदार प्रतिउत्तर दिलं.
परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. याची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत. तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे बारामती परिसरात पाहणी दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली.
काय म्हणाले होते फडणवीस?
राज्य सरकार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर, “कोणतंही संकट आलं की सगळी जबाबदारी केंद्रावर ढकलायची आणि आपण नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण योग्य नाही. मोदी सरकार मदत करणारच पण राज्यावर संकट आल्यानंतर पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी झटकून कसं काय चालेल?” अशी टीका केली.
मुख्यमंत्री ठाकरेंचा जोरदार पलटवार
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, “राज्यात अतिवृष्टी झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर त्यात त्यात गैर काय? केंद्रातलं सरकार हे देशाचं सरकार आहे परदेशातील सरकार नाही. संकटाच्या परिस्थितीत सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे राजकारणाचा चिखल करायला नको. शुक्रवारी पंतप्रधानांचा सुध्दा मला फोन आला होता. त्यांनी आवश्यक ती मदत करू असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काही गैर नाही.”
पावसाला सुरुवात झाल्यापासून यंत्रणेच्या संपर्कात
राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असतानाही मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत असा आरोप विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज बोलताना, ‘आजच मला परिस्थिती कळली असं नाही. पावसाला सुरुवात झाल्यापासून यंत्रणेच्या संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, पाऊस किती पडतोय याची माहिती सातत्याने घेत होतो. उद्या परवाही मी येणार आहे.’ असं सांगितलं.