पुणे – शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. उपवासासाठी लागणाऱ्या रताळांची आवक मार्केट यार्डातील तरकारी विभागात होत आहे. सांगली जिल्ह्यातील कराड, मलकापूर भागांतून आणि कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून ही आवक होत आहे.
रताळींना गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 30 टक्के कमी भाव मिळत असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.
यावर्षी अधिक महिना असल्याने नवरात्रोत्सव नेहमीच्या तुलनेत उशिराने आला आहे. परिणामी, पीक आल्यानंतर अधिक महिन्यापासूनच रताळींची आवक होते. परिणामी, एक महिना हंगाम वाढला आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
कराड, मलकापूर भागांतून आलेल्या रताळींना घाऊक बाजारात प्रती किलोस 20 ते 25 रुपये भाव मिळत आहे. तर, कर्नाटक रताळींना कमी 12 ते 15 रुपये भाव मिळत आहे. दोन्ही रताळींना गेल्या वर्षीपेक्षा कमी भाव मिळत आहे.
कराड भागातील रताळींना गेल्यावर्षी 35 ते 40 रुपये मिळत होता. तर, बेळगाव भागातील रताळींना 25 ते 30 रुपये मिळाला होता. रविवारी येथील बाजारात कराड, मलकापूर भागातून 2 हजार गोणी, तर, बेळगाव भागातून 2 टेम्पो रताळींची आवक झाली.