पुणे –महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) निकालाच्या घोटाळ्यामुळे शालेय शिक्षण विभागाला “भ्रष्ट’ कारभाराला काळिमा लागला आहे. या बदनाम झालेल्या परीक्षा परिषदेचा बहुसंख्य अधिकाऱ्यांनी धसकाच घेतला आहे. येथे बदलीने येण्यासाठी अधिकारी मंडळी स्पष्ट निरुत्साह दाखवत आहेत.
‘टीईटी’ परीक्षेच्या निकालात फेरफार करुन अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी मोठ्या भानगडी झाल्या. यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब पुणे पोलिसांनी उघडकीस आणली. “टीईटी’ घोटाळ्या प्रकरणी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, तत्कालिन उपसचिव सुशील खोडवेकर, जी.ए.सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालकांसह काही एजंट, कर्मचारी यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पूर्वी परीक्षा परिषद हे निवांत व सोयीचे कार्यालय होते. त्यामुळे येथे बदली करुन येण्यासाठी बहुसंख्य अधिकारी इच्छुक असायचे. आता मात्र “टीईटी’ घोटाळ्याच्या धसक्याने अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
24 जण रांगेत…
राज्यातील विविध कार्यालयांतील 24 अधीक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यात पुण्यातीलच 13 जणांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी शासनाने पसंती कार्यालये मागवली आहेत. यातील बहुसंख्य अधिकाऱ्यांनी परीक्षा परिषदेच्या कार्यालयात बदली व्हायलाच नको अशी ठाम भूमिका घेतली आहे. पसंती नोंदविताना परीक्षा परिषदेचे कार्यालय वगळण्याचाच पवित्रा अनेकांनी घेतला आहे.