मुंबई – करोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन सल्ला घेता यावा यासाठी सुरु झालेल्या ई-संजीवनी ओपीडीच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत 6000 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी दिवसातून दोन वेळेस ओपीडीदेखील सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी सकाळी 9.30 ते दु.1.30 या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जायचा आता त्यात वाढ करुन दु.3.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेतदेखील ओपीडी सुरु असणार आहे.
या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ऍप देखील सुमारे 4 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहे. ऍण्ड्राईड आधारित ऍप असल्याने त्याचा फायदा स्मार्ट फोनधारकांना होत आहे.
राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट दिल्यास त्यांना तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो.
राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो. राज्यभरात आतापर्यंत 6072 जणांनी यासेवेचा लाभ घेतला आहे.