नवी दिल्ली – वेश्याव्यवसायासाठी मुलींच्या तस्करीमध्ये कथित सहभागाच्या आरोपावरून राष्ष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने 12 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये 9 बांगलादेशींचाही समवेश आहे. भारतीय दंड संहिता, अनैतिक मानवी वाहतुक बंदी कायदा आणि विदेशी नागरिकांशी संबंधित कायद्यातील तरतूदींखाली शनिवारी हैदराबादमधील न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.
मोहम्मद युसुफ खान, बिठी बेगम, मोहम्मद राणा हुसेन, मोहम्मद अल मोमून, सोजीब शैक, सुरेश कुमार दास, मोहम्मद अब्दुल्ला मुंशी, मोहम्मद अयूब शेख या बांगलादेशी नागरिकांसमवेत रुतुल आमिन दहाली (पश्चिम बंगाल), असाद हसन आणि शरीफुल शैक (दोघेही रा. महाराष्ट्र) या तिघांविरोधातही हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याशिवाय अब्दुल बरीक शैक हा आरोपी फरार आहे.
गेल्या वर्षी 21 सप्टेंबर रोजी हैदराबादेतील दोन कुंटणखान्यामधून 10 मानवी तस्करांना अटक करण्यात आल्यावर या संदर्भात हैदराबादमधील पहाडीशारीफ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कुंटणखान्यातून चार बांगलादेशी तरुणींची सुटका करण्यात आली होती.
यावेळी केलेल्या कारवाईच्यावेळी काही डिजीटल उपकरणे, बनावट भारतीय ओळखपत्रे आणि अन्य गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्यांचा
मानवी तस्करी करणाऱ्य दहाली आणि अब्दुल बारीक शैक यांच्याशी संबंध असल्याचे “एनआयए’च्या तपासात निष्पन्न झाले होते.