नगर -शेतकरी सभासदांना नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे. ते कर्ज शून्य टक्के व्याजदरानेच देण्यात येत असल्याने त्याबाबत पुन्हा नवीन संभ्रम नको, असे स्पष्टीकरण जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सिताराम गायकर व उपाध्यक्ष रामदास वाघ यांनी आज दिले.
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मागील वर्षीची दुष्काळी परिस्थिती तसेच चालू वर्षातील करोना महामारीचे संकटाने निर्माण झालेल्या अर्थिक कोंडीचा विचार करुनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात कर्जदार शेतकरी सभासदांना 3 लाखापर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदरानेच उपलब्ध करून देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. तथापि, या योजनेबाबत जिल्हयातील शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झाला. तसेच त्या संदर्भात जिल्हा बॅंकेकडे तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्यामुळे त्याची दखल घेऊन हे स्पष्टीकरण देण्यात आल्याचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.
3 लाखपर्यंतच्या कर्जाचे रकमेवर शासनाकडून दिला जाणारा व्याज परतावा हा थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली. बॅंकेने चालू वर्षाकरीता भोगवाटा वर्ग-2 नोंद असलेल्या जमिन धारकांना देखील पीक कर्ज वाटपाचा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा प्रकारचे जमिनींचे 8 अ तसेच 7/12 उताऱ्यावर सभासदाच्या नावाची नोंद मालकी हक्कात असणे आवश्यक आहे. तसेच या जमिनी लागवडीखाली असणे आवश्यक आहे, अशी माहीती बॅंकेचे ज्येष्ट संचालक शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे म्हणाले, “”जिल्हा बॅंक शेतकऱ्यांना प्राथमिक विविध कार्यकारी सेवा संस्थामार्फत कर्ज पुरवठा करत आहे. चालू वर्षी शासनामार्फत मिळणारे एक लाखापर्यंतचे पीक कर्जावरील 3 टक्के, राज्य शासन व 3 टक्के प्रमाणे केंद्र शासनची व्याज सवलत मिळून सभासदास शून्य व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे.