पावसाळी पूरस्थितीबाबत डॉ. शैलजा देशपांडे यांनी व्यक्त केले मत
पुणे – पावसाळ्यात सातत्याने उद्भवणाऱ्या पूरस्थितीसाठी ओढ्या, नाल्यांचा नैसर्गिक गुणधर्म बदलण्याच्या घटना सर्वाधिक कारणीभूत आहे. अतिक्रमण, डोगरफोड, वृक्षतोड या प्रकारांमुळे ओढे-नाल्यांचे मूळ प्रवाह बदलल्यानेच संपूर्ण शहराला पूराचा धोका निर्माण झाला आहे. पुणे शहर स्मार्ट सिटीपेक्षा सेफ सिटी कशी हाईल, यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत नदीपरिसंस्थेच्या अभ्यासक डॉ. शैलजा देशपांडे यांनी व्यक्त केले.
शहर परिसरात पावसामुळे पूरसदृशस्थिती निर्माण होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शहरात बुधवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या स्थितीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. सातत्याने निर्माण होणाऱ्या या परिस्थितीबाबत
डॉ. देशपांडे म्हणाल्या की, पुण्याच्या पर्यावरणशास्राचा विचार करता, शहराचा आकार हा बशी सारखा आहे. शहरामध्ये अनेक टेकड्या, नदी, नाले, ओढे अस्तित्वात आहे. हे सर्व घटक शहराचे नैसर्गिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये नाल्यांवरील अतिक्रमणामुळे त्यांचा मूळ प्रवाह बदलला आहे. क्रॉंक्रीटीकरणामुळे जमिनीत पाणी मुरत नाही.
तर, वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमणात जमिनीची धूप होत आहे. त्यातच डोंगरफोडीच्या घटनांमुळे या भागांमधून पडणाऱ्या पावसाचे पाणी वेगाने उताराकडे म्हणजेच नदीकडे वाहते. आपल्यासोबत हे पाणी सगळा गाळ वाहून आणत असल्याने या पाण्याचा जोरही जास्त असतो, अशा स्थितीत मूळ प्रवाह बदलल्याने इतरत्र हे पाणी अतिशय वेगाने पसरते. त्यामुळेच पूरसदृश स्थिती निर्माण होते, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.