लखनौ – हाथरस पीडितेच्या पार्थिवावर मध्यरात्रीच्या काळोखात घाईघाईने आणि जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्याच्या कृतीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तशाप्रकारचे अंत्यसंस्कार मानवी हक्कांचा भंग असल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने त्याबद्दल जबाबदारी निश्चित करण्यावर जोर दिला.
उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठापुढे सोमवारी हाथरस प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीच्या दिवशी राखून ठेवलेला आदेश न्यायालयाने मंगळवारी जारी केला. हाथरससारख्या प्रकरणात अंत्यसंस्कार करण्याविषयी निकष निश्चित करण्याची सूचना न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला केली.
संबंधित प्रकरणाची संवेदनशीलता विचारात घेऊन उत्तरप्रदेशातील अधिकाऱ्यांनी, राजकीय पक्षांनी आणि इतरांनी जाहीर वक्तव्ये करणे टाळावे. प्रसारमाध्यमांनीही बातम्या देताना संयम बाळगावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.