लखनौ – हाथरस येथील दलित युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा जो प्रकार घडला आहे त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीला आणखी दहा दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.
30 सप्टेंबर रोजी गृह विभागाचे सचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमण्यात आली असून या समितीला सुरुवातीला सात दिवसांची मुदत देण्यात आली होती.
ही मुदत आज उलटून गेल्यानंतरही त्यांचा अहवाल अजून तयार नसल्याने त्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली असली तरी सीबीआय तपासावर कोणत्याही घटकाचा विश्वास राहिलेला नसल्याने या प्रकरणाची कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी केली जावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.