नगर -शहरांमधील बहुतेक प्रवाश्यांना अजुनही रिक्षांशिवाय पर्याय नाहीत. त्यामुळे करोनाचा सर्वाधिक धोकाही याच प्रवासी वाहतुकीतून संभवतो. सबब, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी रिक्षाचालकांना सर्वाधिक काळजी घ्यावी लागेल, असे विचार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे शहर-जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक आघाडीचे शहर सचिव तन्वीर मणियार यांच्यातर्फे रिक्षाचालकांना संरक्षण किट व मास्कचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. युवक आघाडीचे शहर-जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे ,अमित खामकर, संतोष ढाकणे, सज्जाद बागवान, सनी साठे, सतीश शिरसाठ यांच्यासह रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यावर देशामध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे रिक्षाचालक व्यावसायिकांवर आर्थिक संकट आलेले आहे. बेरोजगारी वाढली. नागरिक रिक्षात बसायला घाबरत आहेत. अशावेळी रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहासाठी सरकारकडे विशेष आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार जगताप यांनी यावेळी दिली. वैभव ढाकणे यांनी मनोगत व्यक्त केले.
करोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी नागरिकांच्याही सहकार्याची गरज आहे. आमदार संग्राम जगताप यांनी लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यावसायिकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. तीच भूमिका अन्य कार्यकर्त्यांनी घेऊन वंचित घटकाला मदत करावी, असे ढाकणे म्हणाले. तन्वीर मणियार यांनी मनोगत व्यक्त केले.