नवी दिल्ली – करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विकसित करण्यात येत असलेल्या तीन लसी वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात आहेत. त्यापैकी दोन भारतीय लसींच्या उमेदवारांवरील चाचण्यांचा पहिला टप्पाही पूर्ण झाला आहे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात “आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.
“भारतात सध्या तीन लसी वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात आहेत. झायडडस कॅडिला आणि भारत बायोटेकने पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण देखील केल्या आहेत. त्याच्या निष्कर्शांचे विश्लेषण केले जात अहे. आता दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्याचे काम सुरू आहे.’ असे डॉ. भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोविड-19 विरोधात देशात विकसित करण्यात येत असलेल्या लसींबाबत विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते.
“सीरम इन्स्टिट्युटने दुसऱ्या टप्प्यातील बी 3 चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आता 7 दिवसांच्या अवकशानंतर सीरम इन्स्टिट्युटकडून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या जातील. एकूण 14 ठिकाणी सुमारे 1,500 रुग्णांवर या चाचण्या केल्या जातील.’ असे त्यांनी सांगितले.
मानवी चाचणी दरम्यान एका उमेदवाराची प्रकृती बिघडल्यानंतर ऍस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीच्या चाचण्या थांबवल्या होत्या. त्यानंतर भारतीय औषध महासंचलनालयाने सीरम इन्स्टिट्युटला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी कोणत्याही नवीन उमेदवारांची नियुक्ती करू नये, असे सांगितले आहे. दरम्यान ऍस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील चाचण्यांना पुन्हा सुरुवात केली आहे, असेही डॉ. भार्गव म्हणले.
अद्यापही करोना विषाणूविरोधात खात्रीशीर लस उपलब्ध नाही. भारतातील लसीसंदर्भात प्राधान्य, लसीचे योग्य वितरण, लसींची साठवणूक आणि वाहतुक आणि ज्यांना ही लस द्यायची आहे, त्यांचे प्रशिक्षण हे चार महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.