नवी दिल्ली – जागतिक बॅडमिंटनमधील मानाची समजली जात असलेल्या उबर थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेसाठी फुलराणी सायना नेहवाल हिच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. पी. व्ही. सिंधूने या स्पर्धेतून वैयक्तिक कारणाने यापूर्वी माघार घेतली होती. मात्र, आता तिने या स्पर्धेत सहभागी होण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने आधी सिंधूने या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे कळवले होते. मात्र, काही तासांतच तिने हा निर्णय बदलला.
भारतीय बॅडमिंटन संघटनेने या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला. सिंधूसह सात्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे. संघटनेने या स्पर्धेसाठी नवोदित खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.
येत्या 3 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत डेन्मार्कमध्ये ही स्पर्धा होत आहे. सायनासह साई प्रणित व किदाम्बी श्रीकांत यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच सायनाचा पती पी.कश्यप तसेच लक्ष्य सेनचाही संघात समावेश झाला आहे. एम. आर. अर्जुन व ध्रुव कपिला जोडी देशाचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करेल.