नवी दिल्ली – ‘जी 20’ सदस्य राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांनी संयुक्तपणे कार्य करणे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट पद्धती स्वीकारण्याचा संकल्प केला आहे. यामुळे सदस्य देशांमध्ये सर्वसमावेशक न्याय्य तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकेल. त्याचबरोबर आपत्तीच्या काळामध्ये सर्वांना शिक्षणाच्या संधी मिळू शकतील.
‘जी-20’ सदस्य राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांची आभासी बैठक काल झाली. या बैठकीमध्ये संकटाच्या काळामध्ये आवश्यक असलेले निरंतर शिक्षण, अगदी प्रारंभी बाल्यकाळामधले शिक्षण आणि शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण या विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केले. ज्या विषयांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आपले सरकार करीत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून या लक्ष्यपूर्तीसाठी काम करण्यास भारत वचनबद्ध असून शिक्षण क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारत आपले प्रयत्न निरंतर सुरू ठेवणार आहे.
कोविड-19 महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्रापुढे आव्हान निर्माण झाले असले तरीही त्याचा सामना करण्यात येत आहे. भारत शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी-20 सदस्य देशांना सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचेही पोखरियाल यांनी सांगितले.