कामगारांची जबाबदारी पूर्णत: साखर कारखान्यांवर
पुणे – ऊस गाळप हंगाम यंदा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याचा आराखडा साखर आयुक्तालयाकडून तयार करण्यात येत आहे. त्यानुसार ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्याची जबाबदारी साखर कारखान्यांवर सोपवण्यात येणार आहे.
यंदाच्या ऊस गाळप हंगाम 180 कारखाने गाळप करतील, असा अंदाज आहे. त्यासाठी हजारो कामगार ऊस तोडण्यासाठी घराबाहेर पडणार आहेत. परिणामी, करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने साखर आयुक्तालयाने आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कारखान्यांनी कोणकोणत्या सुविधा पुरवाव्यात आणि कामगारांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत.
ऊस तोडणी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी साखर कारखान्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार कामगारांना मास्क आणि सॅनिटायझर पुरवणे, त्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे, औषधोपचार करण्याच्या सूचना कारखान्यांना दिल्या आहेत.
प्रत्येक कामगाराला प्रत्येकी किमान दोन मास्क, साबण आणि सॅनिटायझर पुरवण्यात यावे तसेच त्यांचा वापर होतो किंवा कसे, हे पाहण्याचीही जबाबदारी कारखान्यांवर टाकण्यात आली आहे. कामगारांना करोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर उपचार आणि विलगीकरणाची व्यवस्था कारखान्यांनी करायची आहे, असे साखर आयुक्तालयाकडून सुचवण्यात आले आहे.
ऊस तोडणी कामगारांनी शक्यतो लहान मुलांना बरोबर आणू नये, असे आवाहन केले जाणार आहे. मात्र, अनेक कुटुंबांमध्ये लहान मुलांना मूळ गावी ठेवण्याची व्यवस्था नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पाळणाघर आणि शालेय मुलांसाठी साखर शाळा या व्यवस्था करण्याचे सुचवण्यात येणार आहे. याच्या अंमलबजावणीबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे.
– शेखर गायकवाड, साखर आयुक्त