पुणे – “विद्यापीठ, महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरू यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे. समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा,’ अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची भेट घेतली. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन केलेली कार्यवाही, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाबतच्या भावना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकांची माहिती सामंत यांनी राज्यपालांना दिली. यावेळी राज्यपालांनी वरील सूचना दिल्या.
गुरुवारी (दि.3) दुपारी 4 वाजता राज्यपालांच्या उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापींठाचे कुलगुरू यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यात समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे.
“सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतचे निर्देश दिल्यानुसार राज्यात पदवी परीक्षा रद्द न करता विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रापर्यंत जावे लागणार नाही,’ असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. “या मुद्द्यांवर राज्यपालही सकारात्मक आहेत.