9 सप्टेंबरपासून बाजारपेठ पूर्ववत सुरू होणार
कराड (प्रतिनिधी) – कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा कहर वाढतच चालला आहे. या करोना महामारीमुळे अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. कराड ही महत्त्वाची बाजारपेठ असल्याने येथे कायम गर्दी असते. त्यामुळे शहरातील काही व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन आठ दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला शहरातील व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
गत चार दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन बैठक घेतली होती. सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाशी भेट घेऊन संबंधित निर्णयाची माहिती दिली. करोनाला रोखण्यासाठी व्यापारी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत असल्याबाबत प्रशासनानेही कौतुक केले होते. बुधवार, दि. 2 सप्टेंबर ते दि. 8 सप्टेंबर पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे ठरले होते. मात्र, बुधवारी शहरातील काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवल्याने या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
दरम्यान, व्यापारी असोसिएशनच्या वतीने दुकाने बंद करण्याबाबत आणखी एकदा आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, गत चार महिन्यात व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे या बंदमध्ये त्यांनी दुकाने बंद ठेवावी अशी सक्ती केली जाणार नाही. असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.