नगर (प्रतिनिधी) – भिंगार येथील मानाच्या देशमुख गणपतीची उत्थापना पूजा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या हस्ते होवून सनई-चौघड्यांच्या सुरात फुलांनी सजवलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच भाविक उपस्थित होते.
भिंगार येथे गणरायाला दरवर्षी द्वादशीला मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जातो. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातच गणरायाची पूजा, आरती करून लगेचच प्रतिकात्मक विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरवर्षी पूजन झाले की मानाचा गणपती फुलांनी सजवलेल्या पालखीतून विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. त्यानंतर गावातील व उपनगरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होत. भिंगारवेस, गवळीवाडा, सदरबाजा, भिंगारबॅंक, दाणेगल्ली, मोमीणपुरा, पाटील गल्ली, लोहार गल्ली, नेहरू चौक, शिवाजी चौक, सरपण गल्ली व पुन्हा ब्राह्मणगल्ली मार्गे गणपती घाट येथील विहिरीत सायंकाळी सहा वाजता मानाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. मात्र या प्रथेस करोना संसर्गामुळे खंड पडला आहे.
गणेशोत्सवासाठी 16 मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठाना केली होती. यापैकी दुपारी दोन वाजेपर्यंत सम्राट तरुण मंडळ (गवळीवाडा), समर्थ प्रतिष्ठाण (दाणेगल्ली), संघर्ष-मैत्री मंडळ, धनगरगल्ली, साईबाबा व्यापारी मित्र मंडळ (सदरबाजार) या सार्वजनिक मंडळांनी जागेवरच गणेशमूर्तीचे विसर्जन केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी समजदारीची भूमिका घेतली.
सर्वत्र शांततेत पण भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. यावर्षी अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा केलाच नाही. करोना संसर्गामुळे छावणी परिषद व कॅम्प पोलिसांनी विसर्जन विहिरीवर जाण्यासाठी भाविकांना मनाई केली होती. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी दोन सजवलेले रथ ठेवण्यात आले होते. यामध्ये भाविकांनी आपल्या घरातील गणेशमूर्ती दिल्या. त्या गणपती घाट येथील विहिरीत विसर्जन करण्यात आल्या.