पुणे – विदर्भात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या भागात पुराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) चार तुकड्या पुण्यातून रवाना झाल्या आहेत.
अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशावर असलेला कमी दाबाचा प्रभाव यामुळे निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे महाराष्ट्रातही विशेषतः विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे या भागात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर सरकारने विदर्भात एनडीआरएफच्या चार तुकड्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार रविवारी सकाळी विशेष विमानाद्वारे या तुकड्या रविवारी पुण्यातून नागपूर येथे रवाना झाल्या.
या तुकड्या नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत तैनात केल्या जातील. तसेच एनडीआरएफची एक तुकडी आधीच याभागात बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.