अमृतरथाद्वारे स्वच्छतेचा सुरू केला जागर
संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर शहरातील नागरिकांनी स्थापन केलेल्या गणेश मूर्तीचे विर्सजन व निर्माल्य संकलनासाठी डॉ.जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीरा फाऊंडेशन व नगरपालिकेतर्फे 16 संकलन केंद्र व 5 कृत्रिम तलावांची निर्मिती करुन स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अमृत रथाचे लोकार्पण करण्यात आले.
या अमृत रथाचे लोकार्पण आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सभापती नितीन अभंग, किशोर टोकसे, सुनंदाताई दिघे, बाळासाहेब पवार, श्रीनिवास पगडाल, मिलिंद औटी, फाउंडेशनच्या प्रा. वृषाली साबळे, डॉ. शिल्पा गुंजाळ, डॉ. सुरभी आसोपा, सुरभी मोरे, ऐश्वर्या वाकचौरे, डॉ. अहिल्या ओहोळ, ज्योती थोरात, प्रा. एम. वाय. दिघे, सुभाष सांगळे, अनिल थोरात, निखिल पापडेजा, अभिजित बेंद्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गणेश विसर्जनासाठी व निर्माल्य संकलनासाठी चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, रंगार गल्ली, चव्हाणपुरा, कै. लक्ष्मी चौक, स्वातंत्र्य चौक, राजस्थान थिएटर जवळ, मेनरोड, अकोले रोड, बी. ए. कॉलेज समोर, गणेशनगर, जनतानगर, इंदिरानगर, जयहिंद सर्कल, शिवाजीनगर, एसटी स्टॅन्ड जवळ व नगर रोड, भूमिअभिलेख कार्यालय ही केंद्र उभारली आहेत. जाणता राजा मैदान, रणजित स्पोर्ट क्लब, भारत चौक, नेहरू गार्डन जलकुंभ, पोफळे मळा येथे 5 कृत्रिम तलाव उभारले आहेत.