मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांचा सूत्रधार कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याची अप्रत्यक्ष कबुली अखेर पाकिस्तानने दिल्याने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या या देशाचा बुरखा फाटला.
पाकिस्तानने शनिवारी आपल्या देशातील 88 दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत आणि या दहशतवाद्यांची मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या यादीमध्ये दाऊद इब्राहिम, हाफिज सईद आणि मसूद अझर या कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तिघेही जण भारतातील दहशतवादी कृत्यांना जबाबदार आहेत. अर्थात, पाकिस्तानने यादी जाहीर केल्यानंतर काही काळातच “ही यादी म्हणजे दाऊद इब्राहिम पाकिस्तानात वास्तव्यात असल्याची कबुली नव्हे’, अशी सारवासारव केली असली तरी दाऊद गेले कित्येक वर्षे पाकिस्तानातच वास्तव्यास आहे, याबाबत आता कोणतीही शंका घेण्यास जागा नाही.
पॅरिसमधील “फायनान्स ऍक्शन टास्क फोर्स’ने पाकिस्तानला काही काळापूर्वी इशारा देऊन आपल्या देशातील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे सुचवले होते. त्यासाठी डिसेंबर 2019 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. करोनाच्या महासंकटामुळे ही मुदत आणखी काही काळ वाढवण्यात आली होती. ही वाढीव मुदत संपत असतानाच पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचे किमान नाटक तरी सुरू केले आहे. याबाबत पाकिस्तानने कोणतीही भूमिका घेतली नसती तर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या असत्या आणि जागतिक स्तरावर सर्व प्रकारची आर्थिक मदत बंद झाली असती म्हणूनच केवळ दिखावा करण्यासाठी का होईना, पण पाकिस्तानने दहशतवाद्यांची नावे जाहीर करून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. प्रत्यक्षात ती कारवाई होईल का नाही याबाबत शंका असली, तरी या निमित्ताने दहशतवाद्यांना पाठिंबा आणि आश्रय देणारा सर्वात मोठा देश म्हणून पाकिस्तानचे नाव जगासमोर उघड झाले आहे, हे नाकारता येणार नाही.
भारतासह जगातल्या कोणत्याच देशाला पाकिस्तानच्या या नापाक कृत्याबाबत शंका नव्हती. अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणारा अल-कायदा संघटनेचा नेता ओसामा बिन लादेन यानेही पाकिस्तानात आश्रय घेतला होता आणि अमेरिकेच्या कमांडोंनी पाकिस्तानात अबोटाबाद येथे जाऊन लादेनचा खात्मा केला होता, ही गोष्ट याठिकाणी विसरता येणार नाही. असे अनेक दहशतवादी पाकिस्तानात आश्रयाला आहेत, हे वास्तव आहे. 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका करून अनेकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दाऊद इब्राहिमने तेव्हाच पाकिस्तानात आश्रय घेतला होता. कराचीमध्ये व्हाइट हाउस नावाच्या आलिशान बंगल्यात त्याचे वास्तव्य होते. भारताने अनेकवेळा ही गोष्ट जगातील इतर देशांच्या नजरेस आणली होती, पण दरवेळी पाकिस्तान “दाऊदला आम्ही आश्रय दिलेला नाही’, असे छातीठोकपणे सांगत होता. खरेतर दाऊदने पाकिस्तानात आपले मोठे साम्राज्य उभे केले आहे. पाकिस्तानमधील मोठ्या शहरांमध्ये त्याच्या मालमत्ता आहेत. वरवर दाखवण्यासाठी तो पाकिस्तानमधील बांधकाम क्षेत्रात असला तरी पाकिस्तानात राहूनच तो अंडरवर्ल्डचे नियंत्रण करत आहे. मुंबई, दुबई आणि मलेशियामध्ये अद्यापही दाऊदच्या टोळ्या कार्यरत आहेत.
दाऊदच्या नावावर खंडणी मागणीचे प्रकार अद्यापही मुंबईसारख्या शहरात घडतात, ही गोष्ट नाकारून चालणार नाही. भारतीय न्यायालयांनी दाऊदला मुंबई बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी म्हणून जाहीर केले आहे. दाऊदचं नव्हे तर या स्फोटाच्या कटात सहभागी असलेले अनेकजण पाकिस्तानात वास्तव्यास आहेत. मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद, भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणारा कुख्यात दहशतवादी मसूद अझर यांनाही पाकिस्तानने आश्रय दिला आहे. किमान दाऊद इब्राहिम पाकिस्तानात उजळमाथ्याने वावरताना दिसत नाही, पण हाफिज आणि मसूद अझर पाकिस्तानात उजळमाथ्याने वावरताना दिसत असतात. हाफिज सईदने तर पाकिस्तानातील गेल्या निवडणुकी वेळी वेगळा पक्ष स्थापन करून लढवली होती.
एकीकडे आपण दहशतवादाच्या विरोधात लढत आहोत, असा कांगावा करताना पाकिस्तान किती मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनला आहे याचे यापेक्षा मोठे उदाहरण असणार नाही. “फायनान्स ऍक्शन टास्क फोर्स’च्या इशाऱ्याने पाकिस्तानने जरी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले असले तरी या सर्व परिस्थितीचा भारत कसा फायदा करून घेतो हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. “आम्ही सत्तेवर आल्यास दाऊद इब्राहिमला पाकिस्तानमधून खेचून भारतात आणू आणि त्याला शिक्षा देऊ’, अशा घोषणा भारतातील राजकीय पक्षांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या आहेत. मुंबई बॉम्बस्फोटानंतरच्या काळात देशात कॉंग्रेस आणि भाजप यांची सरकारे आली तरी कोणत्याही सरकारला दाऊदला भारतात आणण्याचे काम जमले नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील लोकांच्या आशा प्रज्वलित झाल्या होत्या; पण या सरकारलाही गेल्या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये दाऊद बाबत कोणतीही कारवाई करता आली नाही. आता पाकिस्तानने स्वतःहूनच आपण मोठ्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे कबूल केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढवून भारताच्या गुन्हेगारांना भारतात आणण्यासाठी मोदी सरकार कशा प्रकारे मुत्सद्देगिरीचा वापर करते, हे पाहावे लागेल.
जागतिक स्तरावर पाकिस्तान विरोधात वातावरण तापवण्याची हीच वेळ आहे. भारताविरुद्ध दहशतवादी कृत्ये करून पाकिस्तानात आश्रयासाठी गेलेल्या दाऊद इब्राहिम, हाफिज सईद आणि अझर मसूद या सर्वांना पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावे, अशी अधिकृत मागणी आता भारताने पाकिस्तानकडे करायला हवी. त्या मागणीला पाकिस्तान कितपत प्रतिसाद देईल याबाबत शंका असली तरी त्यानिमित्ताने पाकिस्तान विरुद्ध वातावरण तयार करण्याची संधी भारताला मिळू शकते.
अर्थात केवळ “फायनान्स ऍक्शन टास्क फोर्स’च्या दबावामुळेच पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे नाटक केले आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. आपण दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहोत, याची कबुली पाकिस्तानने दिली हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल.