नवी दिल्ली – मारूती सुझुकी, होंडा, टाटा मोटर्स या कंपन्यांना भारतातील आगामी सणासुदीच्या काळात वाहन निर्मिती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची आशा आहे.
मारूती सुझुकी इंडियाचे विक्री विभागाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, वाहनांना अलिकडच्या काळात मागणी वाढताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात त्याला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा असली तरी करोनाचा इफेक्ट अजून कितपत राहील याची आपल्याला वाट पहावी लागणार आहे.
होंडा कार्स लि. कंपनीचे उपाध्यक्ष राजेश गोयल म्हणाले की, आम्हाला या सणासुदीच्या काळात मोठ्या व्यवसायाची अपेक्षा आहे. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आम्ही नवीन मॉडेल्स बाजारात आणण्यावर लक्ष केंद्रीत केले.
टाटा मोटर्सचे अधिकारी विवेक श्रीवास्तव म्हणाले की बाजारात सणासुदीचा काळ सुरू झाला असून आमच्यासाठी हा लाभदायी ठरला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात आमच्या वाहन विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे असे त्यांनी सांगितले.