नीलवर्णी आकाश व हिरव्या वृक्षराजीच्या सुंदर पार्श्वभूमीवर कर्णेश्वर हे शिवमंदिर ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा जपत उभे आहे. संगमेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावरील नितांतसुंदर गाव आहे. वरुणा, शास्त्री, अलकनंदा या नद्यांच्या संगमावर वसल्यामुळे या गावाला “संगमेश्वर’ म्हणतात. येथील कसबा भागातील श्री कर्णेश्वर हे प्राचीन मंदिर उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे.
या शिव मंदिरात पाच पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. त्यानंतर थकून भागून ते जेवायला बसले असता कोंबडा आरवला. पांडव तसेच त्यांची ताटे पालथी टाकून निघून गेले. मंदिरात पांडवांचे पालथे ताट म्हणून ओळखले जाणाऱ्या शिल्पावर बकुळफूल कोरलेले आहे. बाजूला पांडवांची आसनेही दिसतात. मंदिराला तीन दरवाजे आहेत. पूर्वाभिमुख द्वारावर शिवपंचायत, नरकासूर आणि किर्तीसुराच्या कोरीवमूर्ती आहेत. दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. महाद्वाराजवळ नंदीमंडपात पाषाणातील नंदीचे दर्शन घडते. श्रीमहालक्ष्मीची व शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. दक्षिणद्वार स्तंभावर शिलालेख कोरला आहे.
मंदिरात पांडवाच्या पाच ताटांसोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते. त्यावर शंकराची पिंडी आहे. गाभाऱ्यात उमटणारी ओंकाराची नादवलये मन प्रसन्न करतात. घुमटाकार छताच्या आतील बाजूस असलेल्या अप्सरा, किन्नर, यक्ष, यक्षिणींच्या सुंदर शिल्पातून जणू स्वर्गच भूमीवर अवतरला आहे, असा भास होतो.
– माधुरी शिवाजी विधाटे