जयपूर – राजस्थान काँग्रेसचे क्रमांक दोनचे नेते सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानात निर्माण झालेला राजकीय तिढा लवकरच सुटणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षातील सुत्रांकरवी मिळाली आहे. पायलट हे लवकरच काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करणार असून यानंतर पायलट बंडाचं निशाण खाली घेतील असा विश्वास काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केला जातोय.
अशोक गेहलोत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या सचिन पायलट यांनी पक्षांतर्गत घुसमट होत असल्याचा आरोप करत बंड पुकारले होते. मात्र या बंडानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलट गट वगळता उर्वरित आमदारांना सरकारसोबत ठेवण्यात यश मिळवलं. अशातच आता काँग्रेस व पायलट यांच्यामध्ये समेट होणार असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सचिन पायलट हे गांधी कुटुंबीयांची अथवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. प्रियंका, राहुल व सोनिया गांधी सध्या एकाच निवासस्थानी मुक्कामी असल्याने पायलट यांच्यासोबत येथेच भेट होईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार दोन आठवड्यांपूर्वी प्रियंका गांधी व सचिन पायलट यांच्यादरम्यान राजधानी दिल्लीमध्ये भेट झाली होती. या भेटीनंतर समेट घडवून आणण्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा झाल्या.
असं असलं तरी पायलट गटाने मात्र हे वृत्त नाकारलं आहे. अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणे ही आमची प्रमुख मागणी असून टी पूर्ण झाल्या खेरीज समेट शक्य नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.