नवी दिल्ली: राजस्थानचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांनी कॉंग्रेसचे निष्ठावान सैनिक असल्याचा पुनरूच्चार केला आहे. त्याचवेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधातील आक्रमक भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
पायलट आणि त्यांचे समर्थक असणाऱ्या 18 आमदारांनी बंड पुकारल्याने कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थानात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशात स्वत: गेहलोत यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींनी बंडखोरांना माफ केल्यास त्यांचे स्वागतच करू, असे शनिवारी म्हटले. त्यानंतर भाजपचा पाहुणचार सोडला तरच बंडखोरांशी चर्चा केली जाऊ शकते, असे कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी मंगळवारी म्हटले.
त्यापार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पायलट यांचे समर्थक असणाऱ्या तीन आमदारांनी भूमिका मांडली. आमचा लढा कॉंग्रेस पक्षाशी नाही. आम्ही पक्षाच्या किंवा पक्षाच्या नेतृत्वाविरोधात कधीच बोललो नाही.
आमचा लढा गेहलोत यांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीविरोधात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्य करू शकत नाही. पायलट यांच्याशी बराच काळ बोलत नव्हतो, असे स्वत: गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यातून ते कशाप्रकारे सरकार चालवतात तेच स्पष्ट होते, असे त्या आमदारांनी म्हटले.
आमचे नेते असणाऱ्या पायलट यांचा सातत्याने जाहीरपणे अपमान केला जात होता. त्यांच्या खच्चीकरणाचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू होते, असा आरोपही पायलट समर्थकांनी केला. बंडाचे निशाण फडकावल्यानंतर पायलट यांचे पंख कापण्यात आले. त्यांची उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली. आता राजस्थान विधानसभेचे अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यावेळी होणाऱ्या शक्तिपरीक्षेतून कुणाचे पारडे जड ठरणार ते समोर येईल.