मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे. आता राज्याचे पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबर रोजी बोलावण्यात येईल, असा निर्णय आज (28 जुलै) कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
याबाबत विधान भवनात आज बैठक पार पडली. सुरुवातीला राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून रोजी होणार होते. त्यानंतर करोनाचा वाढत जाणारा प्रसार लक्षात घेता कोणताही धोका न पत्करता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलून येत्या 3 ऑगस्टला निश्चित करण्यात आले.
सध्या राज्यातील करोनाची स्थिती गंभीर होत जात असताना हे अधिवेशन घेणे तितकेसे सोयीस्कर नसल्याने कामकाज सल्लागार समितीकडून पुन्हा एकदा अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान मंत्री, आमदार, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता आणखी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
करोनास्थितीत गर्दी टाळणे, अंतर राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, कोणताही धोका न पत्करता हे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.