स्वत:जवळ पैसे असो वा नसो, पण सामान्य माणसाला सोन्याच्या भावाचे आणि एकूणच सोन्याचे मोठे कुतूहल राहिले आहे. आज सोन्याच्या भावाचे रोज नवीन उच्चांक नोंदवले जात आहेत. हे दर आता जवळपास 52 हजारांच्या पातळीवर गेले आहेत. आजचा मुंबईतील 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा दर 52 हजार 435 रुपये इतका होता. येत्या आठ ते दहा महिन्यांत हाच दर 65 हजारांवर जाईल, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे.
वास्तविक आज सर्वच पातळ्यांवरचे अर्थकारण बिघडले आहे. करोनाच्या आधीच्या काळापासूनच देशातील उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली होती. परिणामी लोकांच्या उत्पन्नावर आणि रोजगारावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. त्यातच मार्चपासून देशातील आणि जगाच्या बहुतांश भागातील लॉकडाऊनमुळे बहुतेक सारेच व्यवसाय ठप्प झाले. त्यातून पुन्हा बेरोजगारी वाढली. अजूनही त्याचे दुष्परिणाम मोजले जात असून ते इतक्यात सावरतील असे कोणीच म्हणताना दिसत नाही. तरीही सोने मात्र दिवसेंदिवस चांगलेच भाव खाताना दिसत आहे.
सराफ बाजारालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्याकडील विक्रीही मोठ्या प्रमाणात घटली असताना सोन्याचे भाव मात्र चढे कसे असा काहींना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे एक साधे कारण सांगितले जाते, खात्रीशीर गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात असल्याने गुंतवणूकदारांचा सोने खरेदीकडे ओढा वाढू लागला असून त्यातून ही दरवाढ होत आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बॅंक आणि भारतातील रिझर्व्ह बॅंक अशा मोठ्या वित्तीय संस्थांही आपल्याकडील सोन्याचा साठा वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याने सोने तेजीत राहिले आहे.
सोन्याच्या व्यवहाराशी ज्यांचा नियमित संबंध आहे अशा तज्ज्ञांच्या मते पाच महत्त्वाच्या गोष्टीवर सोन्याचे दर अवलंबून असतात. सर्वसाधारण महागाई, जागतिक पातळीवरील अर्थकारणाच्या घडामोडी, सरकारचे सोने साठवण धोरण, ज्वेलरी मार्केटमधील मागणी आणि व्याजदराचा चालू ट्रेंड या पाच घडामोडीचा सोन्याच्या खरेदी-विक्रीवर आणि परिणामी त्याच्या दरावर मोठा परिणाम होत असतो.
शेअरबाजार गडगडत चालला की सोन्याच्या किमती वाढतात आणि शेअरबाजारात तेजी आली की नेमके उलट घडते ही अर्थकारणातील बाळबोध शिकवण सामान्य लोकांच्या चांगली लक्षात राहिली आहे. पण महागाई वाढली की, सोन्याचे दरही वाढतात हे एक अलीकडे प्रस्थापित झालेले समीकरण आहे. कारण चलनवाढीच्या काळात हातात रोकड ठेवून तिचे मूल्य कमी होऊ देण्यापेक्षा गुंतवणूकदार सोने खरेदीत आपला पैसा गुंतवतात. परिणामी त्याचे दर वाढतात.
भारत हा जगातला मोठा सोने आयात करणारा देश आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरील परिणामाचेही या भावावर पडसाद उमटणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. सोन्याला “क्राइसिस कमोडिटी’ म्हणूनही संबोधले जाते. म्हणजेच देशातील सरकार आणि मार्केटवरील लोकांचा विश्वास डळमळीत झाला की सुरक्षित गुंतवणूक म्हणून सरळ सोने खरेदीकडे वळतात असे म्हणतात. जगाच्या अर्थकारणात कितीही उलथापालथ झाली तरी तुमच्या हातात असलेले सोने ही तुमची सर्वात सुरक्षित संपत्ती असते. त्यामुळे डळमळीत अर्थकारण हेही सोन्याची डिमांड वाढण्याचे एक कारण मानले गेले आहे.
औद्योगिक कारणासाठीही देशात बऱ्यापैकी सोन्याचा वापर होत असतो. एका आकडेवारीनुसार देशातील सोन्याच्या एकूण डिमांडपैकी 12 टक्के सोने औद्योगिक क्षेत्रात वापरले जाते. पारंपरिक औषधांसाठीही सोन्याचा वापर होत असतो याचीही अनेकांना कल्पना नसते. बदलते व्याजदर हेही सोन्याच्या दरवाढीचे किंवा दर कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. सोन्याचे दर हे कोणत्याही देशाच्या इंटरेस्ट रेट ट्रेंडचे एक महत्त्वाचे निदर्शक मानले जाते, असे म्हणतात.
व्याजदर वाढले की हातात पैसा राहावा म्हणून सोने विकण्याकडे कल वाढतो. सोन्याचा पुरवठा जादा झाला की सोन्याचे दर कमी होतात आणि व्याजदर कमी झाले की नेमकी याच्या उलट प्रक्रिया होते. म्हणजेच व्याजदर कमी झाले की सोन्याचे दर वाढतात. असा हा सारा सोन्याच्या दरवाढीचा मामला आहे. सोन्याच्या दरवाढीवर किंवा घसरणीवर श्रीमंतांचा जीव टांगणीला लागत असतो.
सोने हा विषय खूप पूर्वी केवळ श्रीमंतांपुरताच मर्यादित असे. त्यामुळे त्याचे दर वाढले काय आणि कमी झाले काय त्याचा बहुतांशी लोकांशी संबंध येत नसे. पण 1991 च्या आर्थिक उदारीकरणानंतर देशात नवश्रीमंत किंवा नवमध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात तयार झाला आणि या नवश्रीमंतांमध्ये गुंतवणुकीचीही दृष्टी निर्माण झाली. ही मंडळीही मग शेअरबाजार, रिअल इस्टेट आणि सोन्याच्या बाजारात व्यवहार करू लागली. त्यामुळे सोन्याचे भाव हा सामान्यांच्या जिव्हाळ्याचाही विषय ठरू लागला आहे.
देशात देवस्थानांकडे किती सोने आहे, रिझर्व्ह बॅंकेकडे किती सोने आहे आणि सामान्य लोकांकडे दागिन्यांच्या स्वरूपातील किती सोने आहे याची रसभरीत आकडेवारी नेहमी प्रसारित होत असते. लोकांना त्यात मोठे कुतूहलही असते. भारतात पारंपरिक काळापासून दागिन्यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करणारा सामान्य माणसांचाही एक मोठा ग्राहक वर्ग असतो.
गुरूपुष्यामृताला आजही रांगा लावून एक ग्रॅम सोन्याची खरेदी करणारा ग्राहक आपल्याला ठिकठिकाणी दिसतो. मागच्या काळात घरात जे दागिन्याच्या स्वरूपातील किडुकमिडुक सोने जमवले आहे तेच आज बहुतांशी लोकांना या महागाई आणि बेरोजगारीच्या काळात कामी येणार आहे. असे सांगतात की नोकऱ्या गमावलेला मोठ्या प्रमाणातील मध्यमवर्ग दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आता आपल्याकडचे दागिन्यांचे स्वरूपातील सोने मग ते तोळा-अर्धा तोळा का असेना बाजारात विकण्यासाठी आणेल. हे प्रमाण खूप मोठे असेल त्यामुळे पुढील काही काळात सोन्याचा मार्केटमधील पुरवठा वाढेल आणि पुन्हा सोन्याचे दर घसरतील, असे सांगणारेही काही लोक भेटतात.
व्यावहारिकदृष्ट्या हे गणित पटू शकते, पण तज्ज्ञ मंडळी मात्र येत्या आठ ते दहा महिन्यांत सोन्याचा दर 65 हजारांवर जाईल, असे सांगत असल्याने त्यांचे हे गणित कशाच्या आधारावर अवलंबून आहे याचा मेळ मात्र अजून लागेनासा झाला आहे. थोडक्यात, सोन्याच्या रोज वाढणाऱ्या दरांमुळे खरेदीदार आणि घरातील सोने विकू इच्छिणारे हे दोन्ही वर्ग सध्या भांबावल्यासारखे झाले आहेत.