शिक्षण मंत्र्यांकडे शिक्षक महासंघाची मागणी
पुणे – कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्याऐवजी त्यांना थेट इयत्ता बारावीच्या वर्गात प्रवेश द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.संजय शिंदे व सचिव प्रा.संतोष फाजगे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
2019-20 या शैक्षणिक वर्षात अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल लावण्याचे आदेश शासनाने दिले होते. यात काही विद्यार्थी नापास झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. अखेर शासनाने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शाळांमध्ये प्रत्यक्ष बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तोंडी परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे आदेश काढले आहेत. परंतु, तोंडी परीक्षा घेणे भौतिकदृष्ट्या व वीज, मोबाइल, इंटरनेट या सुविधांच्या अभावामुळे कठीण आहे.
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षा ही केवळ भाषा विषयापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत तोंडी परीक्षा घेणे शक्य होण्यासारखे नाही.