नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक देशात झपाट्याने वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून देशात ३० ते ३५ हजारांनी रुग्णसंख्या वाढत होती. मात्र आता मागच्या २४ तासात देशात नव्या करोनाबाधितांनी नवा उच्चांक गाठला आहे. देशात एका दिवसात ५० हजारांच्या जवळ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत तब्बल ४९ हजार ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी करोनाबादित रुग्णांची वाढ आहे. देशात वाढत जाणारी हि संख्या धोक्याची घंटा ठरू शकते. गुरुवारी देशात ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण ३०,६०२ करोनाबळी झाले आहेत.
Highest single-day spike of 49,310 cases and 740 deaths reported in India in the last 24 hours.
Total #COVID19 positive cases stand at 12,87,945 including 4,40,135 active cases, 8,17,209 cured/discharged/migrated & 30,601 deaths: Health Ministry pic.twitter.com/veE2V1JgH9
— ANI (@ANI) July 24, 2020
देशातील करोना रुग्णवाढीचा हा नवा उच्चांक नोंदविण्यात आला. देशातील एकूण रुग्णसंख्या १२,८७,९४५ वर पोहोचली आहे. देशभरात करोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढली असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात आतापर्यंत ८,१७,२०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४,४०,१३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. म्हणजेच करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा अधिक आहे.
गेल्या तीन दिवसांत दहा लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यातील गेल्या २४ तासांत सुमारे साडेतीन लाख चाचण्या करण्यात आल्या. आता चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली असून, रोज जवळपास चार लाख चाचण्या करण्यात येणार असल्याचे ‘आयसीएमआर’चे माध्यम समन्वयक लोकेश शर्मा यांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यांशी समन्वय साधून केंद्र सरकार अनेक पावले उचलत आहे. करोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असलेल्या भागांत केंद्राकडून तज्ज्ञांची पथके पाठविण्यात येत आहेत.