नवी दिल्ली – जगाला अधिक चांगला भविष्यकाळ हवा आहे, याबाबत आपल्या सर्वांचे एकमत आहे. आपल्या सर्वांना मिळूनच आपले भविष्य एकत्रितपणे साकार करायचे आहे. भविष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन सर्वप्रथम मानवकेंद्रीत असला पाहिजे, असे आपले ठाम मत असले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत- अमेरिकेच्या बिजनेस कौन्सिलच्या “इंडिया आयडियाज’ परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले.
समर्थ आर्थिक क्षमतांच्या आधारेच जागतिक आर्थिक संपन्नता साधली जाऊ शकेल. उत्पादनक्षमता, साठवणूक क्षमता, वित्तीय व्यवस्थेची सुस्थिती आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे विविधीकरणाच्या आधारे देशांतर्गत क्षमतांमध्ये वाढ करणे हाच याचा अर्थ आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
भारतातील प्रशासन आणि भारतीय नागरिकांमध्ये मोकळेपणा, खुलेपणा आहे. त्यामुळेच भारतात अमाप संधी उद्याला येत आहेत. गेल्या सहा वर्षांत सरकारने अर्थव्यवस्था अधिक मुक्त व सुधारित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आर्थिक सुधारणांनी स्पर्धा आणि पारदर्शकता वाढली आहे. तसेच विस्तारित डिजिटलायझेशन, मोठ्या नवकल्पना आणि अधिक धोरण स्थिरता झाली आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या आता शहरी इंटरनेट वापरकर्त्यांपेक्षाही अधिक होऊ लागल्याचे समोर येते आहे. भारतात विपुल संधी असल्यामुळेच जागतिक समुदायाचे भारताकडे लक्ष लागून राहिले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
“आत्मनिर्भर भारता’च्या आधारे भारत समृद्धीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यासाठी भारताशी भागिदारी करणाऱ्यांची आम्हाला प्रतिक्षा आहे. भारतातील आरोग्यसेवा क्षेत्राची वाढ दरवर्षी 22 टक्क्यांनी होते आहे. मेडिकल टेक्नोलॉजी, टेलिमेडिसीन आणि निदानक्षेत्रातही भारतीय कंपन्यांची प्रगती होते आहे. संरक्षण, अंतराळ या क्षेत्रातही भारतात गुंतवणूकीला मोठी संधी आहे. संरक्षणात थेट परदेशी गुंतवणूकीची मर्यादा 74 टक्के करण्यात आली आहे. उर्जा, तंत्रज्ञान, डाटा ऍनालिसीस, वित्तीय आणि विमा क्षेत्रातील संधीही वाढल्या असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. धोरण सुलभतेमुळे भारतात व्यवसायाच्या अनेक संधी उदयास येत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.