भोपाळ: देशात करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आतापर्यंत 12 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनामुळे जगासह देशात चिंतेच वातावरण असताना भाजपचे नेते व मध्य प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी एक खळबळजनक विधान केले आहे. राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर देशातील करोना महामारी संपेल, असे विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी म्हटले आहे.
रामेश्वर शर्मा म्हणाले, राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरूवात होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी तयारीही सुरू झाली. प्रभू रामचंद्रांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आणि राक्षसांना मारण्यासाठी त्यावेळी पूनर्जन्म घेतला होता.
राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच देशभरात पसरलेली करोनाची महामारी नष्ट होण्यासही सुरूवात होईल, असे शर्मा यांनी म्हटले आहे. करोनामुळे फक्त भारतच नाही, तर संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. आम्ही केवळ सोशल डिस्टन्सिगच पाळत नाही, तर देवांचं नामस्मरणही करत आहोत. राम मंदिर बांधण्याचे सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिलेले आहेत,असे शर्मा म्हणाले.