प्रा. दिगंबर दुर्गाडे
माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, पुणे.
आदरणीय शरद पवार साहेबांच्या राजकीय विचार व तत्वज्ञानाची बैठक तशीच ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच अजितदादा पॅटर्न तयार केला आहे. तो राबविला आणि टिकविलाही आहे. दादांचे राजकीय मॉडेल ही राजकारणातील नवनिर्मिती होती. ठामपणे बोलणे, स्पष्ट बोलणे, खरे बोलणे, परिपूर्ण अभ्यास करणे, प्रत्येक विषय समजेपर्यंत समजून घेणे, वस्तुस्थितीचे आकलन झाले की विषय पूर्ण समजला की त्वरित निर्णय घेणे व त्याची वेगवान अंमलबजावणी करणे ही दादांची “स्टाईल’ आहे.
अखंड प्रेरणेचे धगधगते “अग्नीकुंड’ म्हणजे अजितदादा. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात व सहकारात औद्योगिक, शिक्षण क्षेत्रात दादांनी आपल्या कामाचा “दादा’ ठसा उमटविला आहे. तसेच कृषी, क्रीडा, साहित्य, कला, कामगार क्षेत्रांना सातत्याने मदत केली आहे.
दादा हे खऱ्या अर्थाने राजकारणातील व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कुटुंबातील दादा आहेत. प्रत्येकाच्या संकटाला धावून जाणे, अगदीच गरज असेल, निकडीची परिस्थिती असेल, समाजाचे हित असेल तर नियम, परंपरा, संकेत याला फाटा देवून दादा ते काम मार्गी लावतात. नियमांचे बागूलबुवा ते करीत नाहीत. प्रशासनावर त्यांची भक्कम मांड असते. इतर नेत्यांना नियमातील कामही नाकारणारे प्रशासन दादांपुढे मात्र, सुतासारखे सरळ असते. योग्य कामाला नाही म्हणायचे त्यांचे धाडस नसते. प्रशासनावर एवढी प्रचंड पकड असणारा राजकीय नेता माझ्या पाहण्यात नाही.
दादांकडे ग्रहणक्षमता, बुद्धी, निर्णयक्षमता, विश्लेषण कौशल्य व निरीक्षण अफलातून आहे. दादांच्या गुणवत्तेचा प्रचंड साठा आहे. एवढ्या विविध प्रकारच्या परस्परविरोधी गुणवत्ता एका माणसाच्या ठायी असणे, हे अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. दादा एकाचवेळी विद्यार्थी व शिक्षक असतात. रागातही असतात. प्रेमातही असतात. सहकार्य करतात. शिस्तही लावतात. कठोरही असतात. व प्रेमळही असतात. आग्रही असतात. व आग्रह व हट्टही ऐकतात. सत्ताप्राप्तीची व सोडण्याची तयारी असते.
दुसऱ्यांच्या चुका स्पष्टपणे सांगतात. व स्वत:च्या चुका झाल्यास जाहीरपणे मान्यही करतात. जहालही असतात. व मवाळही असतात. आक्रमक असतात. पण बचावाची तटबंदीही भक्कम करतात. कठोरपणा जपतानाही मनातून प्रचंड हळवे असतात. जे नियम दुसऱ्याला लावतात. तेच नियम स्वत:लाही लावून घेतात.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दादांनी दिली. मी ना प्रस्थापित राजकारणी होतो. ना पैसेवाला होतो. ना कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी होती. किंबहुना मला चेअरमन करा, अशी मागणीही मी कधी त्यांच्याकडे केली नव्हती. मात्र, कार्यकर्त्याला हेरणे, त्याला घडवणे, त्याच्यावर जबाबदारी आणि विश्वासही टाकणे व त्यातून नवीन नेतृत्वनिर्मिती करणे हे दादा महाराष्ट्रात गेल्या 30 ते 35 वर्षे अहोरात्र करीत आहेत. दादा मुख्यमंत्री व्हावेत, ही तमाम महाराष्ट्राची आकांक्षा आहे.
दादा मुख्यमंत्री होणे, हे पुरोगामी आधुनिक व विकसित महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे. त्यांनी निर्माण केलेल्या विकसित केलेल्या संस्था या महाराष्ट्राच्या विकासाची तिर्थक्षेत्रे आहेत. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बारामती मॉडेल विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
दादा मुख्यमंत्री झाल्यास साहेबांनंतर महाराष्ट्राला एक सर्वोत्तम मुख्यमंत्री लाभेल आणि महाराष्ट्र पुन्हा देशातील क्रमांक एकचे राज्य म्हणून नावलौकीक मिळवेल, यात शंकाच नाही. त्यासाठी सर्वच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष तळागाळात पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटले पाहिजे. दादांना मुख्यमंत्री बनवले पाहिजे. साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवू या! याच दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दिर्घ आरोग्य लाभो. ही ईश्वरचरणी प्रार्थना.
शब्दांकन :
समीर भुजबळ (वाल्हे)