लखनौ – उत्तर प्रदेशात गेल्या तीन वर्षांत तब्बल 6 हजार एन्काउंटर झाली असून या एन्काउंटरमधून 122 गुन्हेगारांच खात्मा करण्यात आला आहे. तर 13 पोलीस कर्मचाऱ्यांनाही या एन्काउंटरमधून प्राण गमवावे लागले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
उत्तर प्रदेशात 20 मार्च 2017 पासून 10 जुलै 2020 पर्यंत एकूण 6 हजार 126 एन्काउंटर झाली आहेत. 13,361 गुन्हेगारांना अटक झली. 2,296 गुन्हेगार जायबंदी झाले आणि या चकमकींमध्ये 909 पोलीस देखील जखमी झाले, असे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर्षी 1 जानेवारीपासून 15 जूनपर्यंत उत्तर प्रदेशात लुटालुटीच्या 579 घटना घडल्या. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांपेक्षा हे प्रमाण 44.17 टक्क्यांनी कमी आहे. या वर्षी आतापर्यंत 33 दरोडे पडले. हे प्रमाण देखील गेल्या वर्षीपेक्षा 37.74 टक्क्यांनी कमी आहे. तर हुंड्याशी संबंधित मृत्यूच्या 1,019 घटना या वर्षात घडल्या आहेत.
या घटना 6.37 टक्क्यांनी घटल्या आहेत. तर बलात्काराच्या 913 घटना या वर्षी घडल्या. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 25.41 टक्क्यांनी कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. कानपूरच्या चकमकीमध्ये 8 पोलीस मारले गेले होते.
त्या प्रकरणातील 21 आरोपींपैकी 6 जण चकमकीमध्ये मारले गेले आहेत अणि चौघाजणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. उर्वरित 11 जणांचा शोध सुरू असल्याचेही कुमार यांने सांगितले.