गुवाहाटी : आसामच्या काझीरंगा अभयारण्यात पुराचे पाणी पसरल्याने दोन गेंड्यांचा मृत्यू झाला. पुराच्या पाण्याने वन्य प्राण्याची जीवितहानी ही तेथील नित्याची बाब झाली आहे. तिनीमुकुनी नाला आणि मिक्रजन भागात गेंड्याचा एक नर आणि मादी मंगळवारी मृतावस्थेत आढळली, असे वनखात्याने बुधवारी स्पष्ट केले. 430 चौरस किमी क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यात या
पावसाळ्यातील गेंड्याच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 26 जून रोजी एका नर गेंड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला होता.
सध्या या अभयारण्याचा 90 टक्के भागाला पुराच्या पाण्याने वेढले आहे. वनविभागाच्या 223 पैकी 153 छावण्यांना पाण्याने वेढले आहे. त्यातील 14 छावण्या रिक्त करण्यात आल्या आहेत.
वनविभागाने बुधवारी दिलेल्या निवेदनात, अभयारण्यातील 66 वन्य पशूंचा या पावसाळ्यात मृत्यू झाला आहे. त्यातील 23 पशू वाहून गेल्यामुळे मरण पावले आहेत. त्यात दोन गेंडे, 15 हरीण आणि पाच जंगली अस्वलांचा समावेश करण्यात आला आहे. 12 हरणांचा वेगवान वाहनांची धडक बसल्याने मृत्यू झाला आहे. सुमारे 45 प्राणी जखमी झाले असून त्यात 44 प्राणी पुराने तर एक वाहनाची धडक
बसल्याने जखमी झाला आहे.
वन कर्मचाऱ्यांनी 117 पशूंची सुटका केली आहे. त्यात एक वर्षाच्या गेंड्याच्या पिलाचा समावेश आहे. त्याचा आईचा शोध अद्याप लागला नाही. दरवर्षी पूर आल्यानंतर दरवर्षी पूर आल्यानंतर काझिरंगामधून हत्ती, गेंडे आणि वाघ जवळचा महामार्ग ओलांडून कारबी अँगलॉंग जिल्ह्यात प्रवेश करतात. या महामार्गावर ताशी 40 किमी वेगाची मर्यादा असूनही दरवर्षी अनेक प्राणी वाहनांची धडक बसून मरण पावतात.