जयपूर – सचिन पायलट यांनी बंडाचा पवित्रा स्वीकारल्याने राजस्थान कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला. त्यातून पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदांवरून हटवण्यात आले. राजस्थान सरकार पाडण्यासाठी भाजपकडून रचण्यात आलेल्या राजकीय कारस्थानाचा भाग पायलट बनल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. तसेच लवकरच ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. मात्र, सचिन पायलट यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार नाही असे स्पष्ट केले आहे.
I am not joining BJP: Sachin Pilot to PTI
— Press Trust of India (@PTI_News) July 15, 2020
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट म्हणाले कि, मी कोणत्याही भाजपा नेत्याच्या संपर्कात नाही. मी अजूनही काँग्रेसमध्येच असून पुढील वाटचालीचा निर्णय समर्थकांशी चर्चा करून घेतला जाईल. तसेच आपण लोकांसाठी काम करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. यावर बोलताना सचिन पायलट म्हणाले, त्यामध्ये काही सत्यता नसून राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली आहे. मग मी पक्षाविरोधात काम का करेन ? असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, राजस्थान विधानसभेचे एकूण संख्याबळ 200 आहे. त्यामध्ये पायलट आणि त्यांच्या समर्थकांसह कॉंग्रेसचे 107 आमदार आहेत. कॉंग्रेस सरकारला अपक्ष आणि लहान पक्षांच्या 18 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. पायलट यांच्या पाठिशी कॉंग्रेसमधील 18 आमदार असल्याचे सांगितले जात आहे. तूर्त मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमताचे पाठबळ असल्याचे चित्र आहे. तसे असले तरी यापुढे घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर गेहलोत सरकारचे अस्तित्व अवलंबून असल्याचे सूचित होत आहे.