-अशोक सुतार
“शाळा’, “एकम्’ नंतर प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांची प्रकाशित झालेली “समुद्र’ ही लघु कादंबरी म्हणजे खोल आंतरिक समजुतीने एकमेकांना स्वीकारत, शांतरसात एकरूप झालेल्या एका दाम्पत्याचा, समुद्राच्या सान्निध्यात विलक्षणपणे उलगडत जाणाऱ्या त्यांच्या भावबंधाचा उत्कट प्रत्यय देणारी कथा आहे. समुद्राच्या साक्षीने स्वतंत्र व्यक्ती म्हणून असलेल्या स्वतंत्र भावविश्वाची समुद्रासारखीच खोल आणि रम्य कथा बोकील यांनी “समुद्र’ या कादंबरीत मांडली आहे. ही कादंबरी मौज प्रकाशन गृहने प्रकाशित केली असून ती फक्त नव्वद पानांची, आटोपशीर आहे.
त्यात केवळ दोनच पात्रे असूनही कादंबरी आपल्याला विविध भाव, भावनांची आंदोलने आणि त्यावर शांतपणे विचार करायला लावते. कादंबरी वाचल्यानंतरही वाचक या कादंबरीतील भास्कर आणि नंदिनीबद्दल विचार करत राहतो. त्यांचा भावनिक गुंता, एकमेकांना समजावून घेण्याची प्रक्रिया याबद्दल वाचक विचार करण्यास प्रवृत्त होतो, हे या कादंबरी लेखनाचे यश म्हटले पाहिजे. दैनंदिन कामकाजात, जगरहाटीत मन कुणाजवळ व्यक्त करावे, हा प्रश्न प्रत्येक मनुष्यासमोर निर्माण होतो. काही माणसे आपल्यालाही एक मन आहे, ते कुणाजवळ तरी उघड करावे, हे विसरून जातात.
संसारातील नित्यक्रम सुरूच असतात; परंतु नेहमी सहवासात असूनही प्रत्येक व्यक्ती भिन्न विचारांत असते. अशावेळी पती-पत्नी नित्याचे जीवन जगतात, परिणामी त्यांच्या दबलेल्या भावना एकमेकांसमोर मोकळ्या होताना दिसत नाहीत. एकमेकांना समजून घेण्यासाठी सुसंवाद आवश्यक असतो, हे या कादंबरीत लेखकाने मांडले आहे. यामुळेच ही कादंबरी व कथानक प्रत्येक माणसाला आपलेसे वाटते. जणू काही आपणच आपले अनुभव वाचत आहोत, असे वाटते. त्यामुळे ही कादंबरी प्रत्येकाला आपली जगण्यातील सत्यकथा वाटते, एक वेगळा दृष्टिकोन देते.
माणसाचे मन हे एक समुद्रच आहे. समुद्र आपल्यामध्ये अनेक गोष्टी सामावून घेतो, किनाऱ्यावर फक्त लाटा दिसतात. किनाऱ्यावरून समुद्राची खोली, समुद्रात असलेल्या गोष्टींचे ज्ञान होऊ शकत नाही. जगातील अनेक व्यक्ती आपल्या सहवासात असतात, परंतु त्यांचे अंतरंग आपण ओळखू शकत नाही. क्वचित काही माणसे असतात, जे आपले विचार ओळखू शकतात, आपल्याशी संवाद साधू शकतात. अशा वेळी समुद्रकिनारी जाऊन बसून राहावे, त्याच्याजवळ मनातील भावनांचे ओझे रिते करावे आणि मग समोरच्याचे ऐकावे. तेव्हा कुठे मनाच्या खोलीचा, असंख्य हालचालीचा थांगपत्ता लागू शकतो. नंतर आपोआप मनातील गुंते सुटत जातात. सुसंवादाने न विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे मिळतात. हेच या कादंबरीत लेखकाने प्रभावीपणे मांडले आहे. ही कादंबरी एका बैठकीत वाचली तरी पुन्हा वाचू वाटते.
वाचक स्वत:च्या मनातील भावनिक गुंते सोडवत असतो, “समुद्रा’त पाणबुडीप्रमाणे आयुष्यातील गोष्टी आणि दुसऱ्याचे अंतरंग शोधत असतो. भास्कर आणि नंदिनी हे दाम्पत्य एकत्र राहूनही असलेला मानसिक दुरावा आणि नंतर समंजसपणे एकमेकांना समजावून घेण्याची उत्कट भावना आणि निश्चिंत मनाचा प्रवास लेखकाने या कादंबरीत चित्रित केला आहे. भास्कर-नंदिनी यांच्या मनातील गुंते सुटतात आणि ते नवा सकारात्मक प्रवास करतात.