पेठ -सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात बटाटा लागवड कमी क्षेत्रात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वाटाणा, भुईमूग, सोयाबीन आदी पिके घेतली आहेत. मात्र बियाणे निकृष्ट दर्जाची मिळाल्याने शेतात उगवण झाली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
सातगाव पठार भागात करोना महामारीने बटाटा बियाणे महाग झाले. त्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप हंगामातील भुईमूग, वाटाणा आदी पिके घेतली; परंतु त्यातील अनेक शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांची झळ पोहोचली आहे. साडेसहा हजार एकर शेती क्षेत्रात दरवर्षी बटाटा लागवड होत असते; मात्र चालू वर्षी हे लागवड क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे त्याऐवजी भुईमूग, वाटाणा फरशी अशी पिके घेण्यात आली. शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.
येथील शेतकरी महादेव रामदुलार धुमाळ, दिलीप धुमाळ, विशाल तोडकर, दिलीप पवळे शेतकरी आपल्या शेतात भुईमूग बियाणे उगवून आलेच नाही. बियाणे निकृष्ट असणे यासाठी स्थानिक कृषिकेंद्र चालक यांना दोषी ठरवू नये. तर याबाबत संबंधित कंपनीला जबाबदार ठरवावे. सध्या सर्व कृषिकेंद्र ग्रामीण भागात बंद आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, अशी खंत सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.