नवी दिल्ली – देशात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 58 टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी आज दिली. सद्य परिस्थितीत देशातील सुमारे तीन लाख रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हर्ष वर्धन म्हणाले, देशातील करोना रुग्णांचा मृत्यू दर हा 3 टक्के आहे, जे अत्यल्प आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा 19 दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाउनच्या आधी हे प्रमाण 3 दिवसांवर होते, अशीही माहिती त्यांनी दिली.
भारतात सध्याच्या घडीला 5 लाख 8 हजार 953 करोना रुग्ण आहेत. यापैकी 2 लाख 95 हजार 880 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 1 लाख 97 हजार 387 रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन देशभरात 15 हजार 600 वर मृत्यू झाले आहेत.
देशात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढते आहे. ही बाब भारतासाठी चांगलीच आहे. मागील 24 तासांमध्ये करोनाचे 10 हजार 245 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत 3 लाखांच्या आसपास रुग्ण देशभरात बरे झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.