नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियान नावाचे एक अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यावर जोरदार टीका करताना कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केवळ जाहिरातबाजीने उत्तरप्रदेशात रोजगार वाढणार आहेत काय असा सवाल त्या सरकारला केला आहे.
त्यांनी फेसबुकवर त्यासंबंधात आपली प्रतिक्रिया नोंदवताना प्रियांकांनी म्हटले आहे की काल उत्तरप्रदेशात मोठ्या ढोलबाजीत नवीन रोजगार कार्यक्रम सुरू झाला आहे. हे सरकार ज्या उद्योगात नोकऱ्या देण्याचे आश्वासन या जाहिरातबाजीत देत आहे ती सर्व क्षेत्रे सध्या अडचणीत आहेत.
स्वयंरोजगार करणारे सारेच लोक असंख्य अडचणीत आहेत. त्यांना सरकारकडून कोणतीही थेट आर्थिक मदत मिळत नाही. छोट्या आणि मध्य उद्योगातील स्थिती तर अशी आहे की त्यातील 62 टक्के उद्योगांनी कामगार कपात केली असून 78 टक्के उद्योगांनी वेतन कपात केली आहे.
उत्तरप्रदेशातील कुक्कुट पालन व्यवसाय, टिंबर व्यवसाय, पितळ व्यवसाय, यंत्रमाग, कार्पेट उद्योग अशी सारी क्षेत्रे अडचणीत आहेत. परराज्यांतून उत्तरप्रदेशात आलेले स्थलांतरित मजुरांच्या रोज आत्महत्या होत आहेत. कानपुरक्षेत्रातही अनेकांनी रोजगार नसल्याने आत्महत्या केल्या आहेत. पण ही सारी वस्तुस्थिती दुर्लक्षित करून हे सरकार केवळ जाहिरातबाजी करीत आहे. त्यातून रोजगार निर्माण होणार आहेत काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.