नारायणगाव -करोनाच्या संशयित रुग्णांच्या लाळेची आरटी-पीसीआर (ठढ-झउठ) तपासणी करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून अखेर राज्य सरकारने चाचणीसाठी आवश्यक किट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला तरी बाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन संशयित रुग्णांची लवकर ओळख पटविणे गरजेचे आहे. मात्र, आपल्याकडे केली जाणारी नासोफरींजियल स्वॅबच्या आरटी-पीसीआर चाचणीची अचूकता 63 टक्के इतकी आहे. डॉ. कोल्हे यांनी लाळेची आरटी-पीसीआर चाचणीचा अवलंब करण्याची मागणी करणारे पत्र आयसीएमआर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले होते.
या पत्राची तात्काळ दखल घेऊन मंत्री टोपे यांनी शेऱ्यासह पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते. लाळेची चाचणी करणे ही सोपी पद्धत आहे. नमुना घेण्यासाठी वैयक्तिक आरोग्य सेवकाची उपस्थिती आवश्यक नसल्याने नमूना घेणे व रोगनिदान करणे प्रक्रिया वेगवान होते. याकडे कोल्हे यांनी लक्ष वेधले होते. यूएस एफडीएने चाचणी पद्धतीला मान्यता दिली असल्याचेही निदर्शनास आणून दिले.
लाळेची आरटी-पीसीआर चाचणी करण्यास मान्यता मिळाल्यास अधिकाधिक संशयित रुग्णांची तपासणी वेगाने होऊन करोनाच्या संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल, असे पत्रात नमूद केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात करोनाच्या चाचण्यांची संख्या वाढेल. वेगाने निदान होण्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी त्याचा फायदा होईल.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार.