कोलंबो- श्रीलंकेत तमिळ बंडखोरांनी मोठ्या प्रमाणावर मुलांना घातपाती कारवायांसाठी भरती करून घेतल्याच्या दाव्याची दखल “युनिसेफ’ने घेतली आहे. या दाव्यातील तथ्य तपासण्यात यावे, अशी
सूचना “युनिसेफ’ने केली आहे. “एलटीटीई’चा पूर्वाश्रमीचा डेप्युटी कमांडर करुणा अम्मान याने हा दावा केला होता. अम्मान याने काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचार सभेमध्ये बोलताना आणखी एक भीषण दावा केला होता. “एलटीटीई’बरोबर तीन दशके झालेल्या यादवी युद्धादरम्यान आपण श्रीलंकेच्या 2 ते 3 हजार सैनिकांना ठार केले असल्याचा दावाही त्याने केला होता. त्याच्या या दाव्यातील तथ्य तपासण्याचे
आदेश श्रीलंका सरकारने दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर घातपाती कारवायांसाठी मुलांच्या व्यापक भरतीच्या दाव्याचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी “युनिसेफ’ने केली आहे.
करुणा उर्फ विनालागमुर्थी मुरलिथरन याची गुरुवारी “सीआयडी’कडून 7 तास कसून चौकशी केली. त्याच्यावर श्रीलंकेतील अनेक सामान्य नागरिक, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी करुणाच्या अटकेची मागणी केली आहे. मुलांना घातपाती कृत्यासाठी भरती करून घेण्याबद्दल आंतरराष्ट्रीय कायद्याखाली त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क आयोगानेही केली आहे. श्रीलंकेत ऑगस्टमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकीमध्ये करुणा स्वतःच्या राजकीय पक्षाकडून उतरला आहे.