पुणे : हिंदी वृत्तवाहिणीवर एका कार्यक्रमादरम्यान भारतीय लष्करावर अपमानास्पद आणि असंवेदनशील भाष्य करण्यात आले. याप्रकरणी चित्रपट निर्माते नीलेश नवलाखा यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयातील वकिल ऍड.राजेश इनामदार व अमीत पै यांनी माहिती तंत्रज्ञान प्रसारण मंत्रायलयाकडे तक्रार केली आहे. या वृत्तवाहिणीला प्रसारण करण्यास बंदी घालावी असे तक्रारीत म्हटले आहे.
भारत -चीनवरील चर्चेदरम्यान ‘आज तक’ वृत्तवाहिणीच्या निवेदकांनी ” ही सैन्याची जबाबदारी आहे, यासाठी तुम्ही सरकारला दोष देऊ शकत नाही’ असे वक्तव्य केले होते. तसेच जर पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि आमचे सैनिक झोपले असतील तर ती जबाबदारी सरकारची नाही असेही म्हटले होते. याप्रकारच्या टीकेमुळे सैन्याचे मनोबल कमी होऊ शकते, यामुळे वृत्तवाहिणीच्या प्रसारणावर बंदी घालावी अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे.
तसेच संबंधीत वृत्तवाहिणीने सुशांतसिंग राजपूत यांच्या मृतदेहाची छायाचित्रेही प्रसारीत केली होती. याचाही उल्लेख तक्रार अर्जात करण्यात आला आहे. तक्रारदार नवलाखा यांनी फॅंड्री, अनुमती, शाळा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह नऊ चित्रपटांची निर्मीती केली आहे. त्यांनी काही दिवसांपुर्वी रिपब्लिकन टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांच्याविरुध्दही धार्मिक तेढ निर्माण केल्याची तक्रार पुणे पोलिस आयुक्तांकडे केली होती.