ड्रायव्हिंगचा ताण, वाहतूक कोंडी, प्रदूषणापासून सुटका
कोंढवा – करोना पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे रस्त्यावर वाहने नसल्याने वाहतूक कोंडी, वायू-ध्वनिप्रदूषण नाही. वर्क फ्रॉम होम असल्याने प्रवासाचा वेळ आणि मनस्ताप वाचला. बदल अपेक्षित आहे, तो स्वीकारून पुढील वाटचाल करण्याची गरज निर्माण झाल्याची भावना संगणकावर काम करणाऱ्यांनी व्यक्त केली.
देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या आणि संगणकाधारित उद्योगांमध्ये स्थिरावलेल्या शहरांतील नोकरदारांनी आपसात केलेल्या संवादावरून स्पष्ट होत आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर आणि सूरत या शहरांमध्ये संगणकाधारित काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामध्ये आपापसात चॅटिंग होते. त्यामध्ये प्रवास, ड्रायव्हिंग अशा एक ना अनेक कटकटींमधून सुटका होत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन संपल्यावरही घरून काम करायला आवडेल, असे या नोकरदारांनी म्हटले आहे.
कामाची जागा आणि निवासस्थान यातील अंतर, स्वत:चे वाहन असल्यास ड्रायव्हिंगचा ताण, प्रचंड वाहतूक कोंडीचा ताण, प्रदूषण (ध्वनी आणि हवा) हे सहन करताना वाया जाणारी ऊर्जा आणि वेळ, मनःस्ताप हे मुद्दे प्रामुख्याने दिसतात. मागील तीन महिन्यांत घरूनच काम केल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कामात झालेली गुणात्मक वाढ उल्लेखनीय असल्याची चर्चाही त्यांच्यामध्ये दिसून येत आहे.
वाहन व्यवस्थेवरील खर्चात बचत…
शहरी नोकरदारांनी मांडलेला दुसरा मुद्दाही विचारात घेण्यासारखा आहे. तो म्हणजे, रोज कार्यालयात पोहोचण्यासाठी अनेक कंपन्यांना वाहन व्यवस्था करावी लागते. त्या व्यवस्थेत मोठी गुंतवणूक करावी लागते. मागील तीन महिन्यांपासून कंपन्यांचा हा खर्च वाचला आहे. यापुढेही “वर्क फ्रॉम होम’ला परवानगी मिळाल्यास कंपन्यांचा हा मोठा खर्च वाचणार आहे.