कराड (प्रतिनिधी) – करोनाचे आगार ठरलेल्या कराड तालुक्यात ओसरलेला करोनाचा प्रार्दुभाव मुंबई-पुणेसह बाहेरहून आलेल्या लोकांनामुळे वाढला आहे. ही तालुक्यासाठी चिंतेची बाब ठरली असून प्रशासनाची डोखेदुखी वाढली आहे.
तालुक्यात दि. 1 एप्रिलला तांबवे गावात पहिला करोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर टप्प्याटप्प्याने बाधितांची संख्या वाढत गेली. झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे कराड तालुका सातारा जिल्ह्यातील करोना बाधितांचे आगार बनला. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस उपाययोजना हाती घेण्यात आली. बाधितांच्या निकट सहवासीत लोकांना क्वारंटाइन करून त्यांचे नमुने घेणे, गावात सर्व्हे करणे, निरजंतुकीकरण करणे तसेच अनुमानितांपैकी कोणी पॉझिटिव्ह आल्यावर पुन्हा त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम आदी कामे प्रशासन, आरोग्य यंत्रणेने प्रभावीपणे केली.
जिल्ह्यातील बाधितांचा आकडा शंभरावर होता. त्यावेळी एकट्या कराड तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 73 वर पोहोचली होती. सर्वात जास्त बाधित रूग्ण वनवासमाची व मलकापूरमध्ये आढळून आले. मात्र, येथील प्रभावी उपाय योजनामुळे ही गावे पूर्णपणे करोनामुक्त झाली. परंतु, म्हासोली, वानरवाडी, शेरे स्टेशन, तुळसण, साकुर्डी, चरेगाव, उंब्रज, रेठरेबुद्रुक, गोटे, खोडशी आणि आता सैदापूर, सुपने, गोवारे, तारूख, केसे आदी गावांतही रुग्ण झपाट्याने वाढत आहे.
प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांच्यासह पोलीस यंत्रणेने घेतलेली काळजी व मेहनत यामुळे अनेक गावातील करोना साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले आहे.
गेल्या महिनाभरात करोना रुग्णांचा मंदावलेला वेग वडगाव (उंब्रज), केसे, विंग, शिंदेवाडी, मालखेड, सुपने, सैदापूर, गोवारे येथे नव्याने रुग्ण सापडल्याने वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाची पुन्हा तारांबळ उडाली आहे. त्यात सध्या परवानगी घेऊन बाहेरील जिल्ह्यातील लोक येत असून ते क्वारंटाइन असतानाच पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरील संकट गंभीर बनले आहे.