पुणे – लॉकडाऊनदरम्यान पक्ष्यांचा किलबिलाट, निळे आकाश, जलाशयात वाढणारी जैवविविधता, हवेतील शुद्धता या गोष्टींची नव्याने ओळख आपल्याला झाली. लॉकडाऊननंतरही पर्यावरण शाश्वत कसे राहील, शुद्धता टिकवता कशी येईल याचा विचार आम्ही करत आहोत. तसेच, पर्यावरण व पर्यटन यांचा योग्य ताळमेळ साधत शाश्वत पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न करत राहू, असे मत राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
“फिक्की फ्लो पुणे चॅप्टर’च्या वतीने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले. यावेळी चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस यांनी ठाकरे यांच्याशी “कोविड-19 व शाश्वत पर्यावरण’ या विषयावर संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जानबी पूखन प्रमुख अतिथी होत्या. चॅप्टरच्या माजी अध्यक्षा वर्षा चोरडिया, सदस्या भाग्यश्री पाटील आदी सहभागी झाले होते.
यावेळी ठाकरे म्हणाले, “पर्यटन हा मोठा उद्योग होऊ शकतो. ज्यातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. पर्यटनासाठी फॅन्सी भपकेबाजी करण्यापेक्षा शाश्वत सौंदर्य टिकवत आपल्या मुळाची ओळख पटवून देणे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील दुर्ग, गड, किल्ले, थंड हवेची ठिकाणे, समुद्र, पठारे, संस्कृती अशा सगळ्याच प्रकारचे सौंदर्य येथे असल्याने तेथे पर्यावरण जपत पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू.’