नवी दिल्ली- फळे व इतर नाशवंत पदार्थाचे दर 100 टक्क्यांनी वाढले तरच अशा वस्तूच्या साठ्यावर मर्यादा घातली जाईल असे अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षातील किमतीचा आढावा घेऊन दर ते 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला तरच फळासारख्या कृषी उत्पादनाच्या साठ्यावर मर्यादा घालण्यात येतील. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यात 60 वर्षानंतर बदल केले आहेत. नाशवंत नसलेल्या अन्नधान्याचे दर जर 50 टक्क्यांनी वाढले तर अशा वस्तूंच्या साठ्यावर मर्यादा घालण्यात येतील असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने केलेल्या जीवनावश्यक वस्तू कायद्यातील दुरुस्तीनुसार अन्नधान्य, डाळी कांदे आणि इतर वस्तूच्या किमतीवरील नियंत्रण काढून टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या मालाला जास्त भाव मिळेल अशा ठिकाणी आपले उत्पादन विकण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी बजार उत्पन्न समितीच्या कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला अधिक भाव मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे.
यासाठी बाजार समिती कायद्यातील बदलाबरोबरच आंतरराज्य अन्नधान्य वाहतुकीवरील अडथळे दूर करण्यात आले आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार डाळी, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, खाद्यतेल, कांदे-बटाटे जीवनावश्यक वस्तू यादीतून वगळण्यात आले आहेत. फक्त राष्ट्रीय आपत्ती, मोठा दुष्काळ किंवा किमतीत जास्त वाढ झाल्यानंतरच सरकार यात हस्तक्षेप करणार आहे.
त्याचबरोबर केंद्र सरकारने गेल्या महिन्यामध्ये कृषी उत्पादनाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला रास्त भाव मिळण्यास मदत मिळेल. सरकारने जाहीर केलेल्या किमतीपेक्षा या उत्पादनांना बाजारपेठेतून दर कमी मिळाला तर सरकार हमीभावाने या उत्पादनाची खरेदी करणे अपेक्षित आहे.