शिवसेनेकडून आयुक्तांना निवेदन
नगर -भाजी बाजार सध्या फक्त नेप्ती येथे सुरु असल्याने शेतकरी, ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मनात नगरमधील मार्केटयार्ड बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे भाजी बाजार पुन्हा शहरातील मार्केटयार्ड येथे सुरु करावा, अशी मागणी आज शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.
शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले. शहरप्रमुख दिलीप सातपुते, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी महापौर अभिषेक कळमकर, उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, मनीष गुगळे, विशाल वालकर आदी यावेळी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्याचे शिवसेनेतर्फे यावेळी सांगण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी नगरच्या बाजार समितीतील भाजीबाजार नेप्ती येथील उपबाजार समितीमध्ये हलविला आहे. नेप्ती उपबाजारामध्ये शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांना आपला माल खरेदी व विक्री करणे आडचणीचे आहे. त्यांना हा उपबाजार शहरापासून लांब पडत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी उपबाजार समितीमध्ये आपला शेती माल विकल्यानंतर रोख पैसे घेऊन शहरात खरेदीसाठी यावे लागते. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, येथील मार्केटयार्डमध्ये तातडीने भाजीबाजार सुरु करण्यात यावा, अशी भूमिका राठोड यांनी मांडली. बाजार समितीतील भाजीबाजार नेप्ती याठिकाणी कायमस्वरूपी ठेवल्यास मुख्य बाजारातील व्यापारी गाळे इतर व्यापाऱ्यांना विकून प्रचंड आर्थिक घोटाळा करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संचालक मंडळ मुख्य भाजीबाजार चालू करण्यास इच्छूक नाही, असा आरोपही राठोड यांनी यावेळी केला.