शिंदे वासुली -बळीराजाच्या जीवापेक्षा प्रशासनाला भामाआसखेड जलवाहिनी महत्त्वाची वाटत असेल आणि ठरल्यानुसार जर एक किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम शासन थांबविणार नसेल तर आम्ही देखील आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.
शासनाच्या या भूमिकेविरोधात आम्ही रविवारी (दि. 7) फक्त पाण्यात उतरलो आहे, मात्र काम बंद केले नाही, तर सोमवार (दि. 8) पासून गावा-गावात शेतकरी जलसमाधी घेतील, असा इशारा भामा आसखेड आंदोलकांनी रविवारी पाण्यात उतरून दिला त्यामुळे भामाआसखेडग्रस्तांनी आता “आर या पार’ची लढाई सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, न्याय मिळेना म्हणून रौधळवाडी येथील ज्ञानेश्वर गुंजाळ या शेतकऱ्याने जलसमाधी घेतली होती. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी जमिनीचा सातबारा व मदतीचा धनादेश प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना दिला गेला. जर पुनर्वसन मार्गी लावायचे असेल तर असेच बळी द्यायचे का ? असा सवाल उपस्थित करून जलसमाधी घेतल्यावर प्रशासन पुनर्वसन करणार का अशी विचारणा शेतकरी करीत आहे.
… मगच बोला
गवारवाडी, वेल्हावळे, आखतुली, कुदळवाडी, पापळवाडी येथील धरणग्रस्त शेतकरी लहान मुले व कुटुंबासह पाण्यात उतरले. जोपर्यंत जलवाहिनीचे काम बंद होणार नाही तोपर्यंत पाण्या बाहेर येणार नसल्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आंदोलक प्रमुख सत्यवान नवले, देवदास बांदल, गजानन कुडेकर आदींनी जलसमाधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती केली. प्रतिक्षा करुया शासन निर्णयाची. तरीही कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. फक्त काम बंद करा, मगच बोला. असा एकच टाहो सुरूच होता.
अधिकाऱ्यांनी ही झटकले हात
सत्यवान नवले यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व उपायुक्त स्मिता पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. व माणसांच्या जीवापेक्षा काम महत्त्वाचे आहे का? आज कदाचित ही माणसे ऐकतील; परंतु उद्या कुणाच्या जीवाचे बरे वाईट झाले तर कोण जबाबदार राहिल? यावेळी अधिकारी म्हणाले की, कामात अडथळा करूनका किंवा कायदा व सुव्यवस्था भंग होईल असा कोणताही अनुचित प्रकार करू नका म्हणून तुम्हाला 149 नोटीस बजावले असताना शेतकरी पाण्यात उतरलेच कसे? असा प्रतीसवाल करीत तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे स्पष्ट केल्याने आंदोलकांना कोणी वालीच नसल्याचे स्पष्ट झाले.