खंडाळा : तालुक्याभोवती करोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. शहरी भागातील चाकरमानी ग्रामीण भागात वास्तव्यास आल्याने संक्रमण अधिक वेगाने होऊन तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 32 वर पोहोचला आहे. अंदोरी येथे करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
संक्रमण पसरू नये यासाठी प्रशासनाबरोबर स्थानिकांनी अधिक खबरदारी घेतली होती. कराडवाडी येथील 29 वर्षांचा युवक औरंगाबादमध्ये नोकरीस असून चुलत्याचे निधन झाल्याने तो 28 मे रोजी गावी आला होता. त्याचे काही दिवस गावात वास्तव्य होते. तो दि. 2 जून रोजी औरंगाबादला गेल्यानंतर तपासणीत त्याला करोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील चार जणांना व इतर तालुक्यातील दोघांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून गावात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.