पुणे – समुद्रात येणारी चक्रीवादळे ही केवळ वातावरणावर परिणाम करतात असे नाही, तर यामुळे समुद्री जीवसृष्टीवरही विपरित परिणाम होत असल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे. अरबी समुद्रात नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी येथील समुद्रात काही महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.
समुद्रात वेळोवेळी उद्भवणाऱ्या वादळांमुळे समुद्रातील जीवसृष्टीवर लक्षणीय परिणाम होतात. विशेषत: जलचरांचा प्रमुख अधिवास असलेली प्रवाळे या वादळांमुळे सर्वाधिक प्रभावित होतात. त्यामुळे अधिवास, खाद्यासाठी या प्रवाळांवर अधारित असणारे मासे आणि इतर जलचरांचा अधिवास नष्ट होण्याची दाट शक्यता या चक्रीवादळांमुळे असते. अशी नोंद सागरी जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या संस्थांकडून करण्यात आली आहे. यंदा पश्चिम बंगाल, ओरिसा येथे अम्फन महाचक्रीवादळ, तर नुकतेच महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये निसर्ग हे चक्रीवादळ उद्भवले होते. या दोन्ही चक्रीवादळांची तीव्रता अधिक होती. हवामान विभागातर्फे महाराष्ट्रात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता सर्वाधिक नोंदविली गेली. त्यामुळे आगामी काळात या भागातील समुद्री जीवसृष्टीवर परिणाम झाल्याचे नक्कीच दिसून, येईल अशी शक्यता समुद्री जीवसृष्टी अभ्यासकांकडून वर्तविण्यात आली आहे.
याबाबत सिंधुदुर्ग येथील समुद्री जीवसृष्टी अभ्यासक डॉ. सारंग कुलकर्णी म्हणाले, “चक्रीवादळामुळे समुद्री जीवसृष्टीवर विविध परिणाम होतात. विशेषत: प्रवाळांवर त्याचा अधिक परिणाम होत असल्याने, या प्रवाळांवर आधारित जलचरांचा अधिवास नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “निसर्ग’ चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात अशाप्रकारचे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यातील समाधानकारक बाब म्हणजे, येथे प्रवाळांची रचना ही अंदमान-निकोबार बेटांमधील प्रवाळांप्रमाणे नाही. तसेच येथे पर्वताधारित प्रवाळांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तुलनेने येथे होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी राहील.’