संभाव्य चक्रीवादळामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी- जितेंद्र डुडी
जुन्नर(प्रतिनिधी ) – अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. ह्या वादळाचा तडाखा मुंबईसह ठाणे, पालघर तसेच पुणे परिसरात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगत घरातच थांबण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
या संभाव्य वादळामुळे तालुक्यात पुढील दोन तीन दिवसांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराची कौले, पत्रे तसेच शेतातील काढून ठेवलेला शेतीमाल याची खबरदारी घ्यावी, असे डुडी यांनी सांगितले आहे. आधीच करोनामुळे घरात बंद असलेल्या नागरिकांना पुढील दोन तीन तरी पुन्हा क्वारंटाईन व्हावे लागण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाला “निसर्ग” असे नामकरण करण्यात येणार असून बुधवारी (दि. ३) उत्तर महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. ते वादळ पुढील २४ तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन -तीन दिवसांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) याबाबतचा अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट भागामध्ये अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतातील मालाला मोठया प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या दोन्ही तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग कामाला लागला असून या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे.